घर मिळाले... पण शेवटच्या प्रवासासाठीही स्मशानभूमी नाही!; भंडार्ली-गोठेघर म्हाडा परिसरातील नागरिकांचा संताप दिवा येथे अंत्यसंस्काराची वेळ; मूलभूत नागरी सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरघर मिळाले... पण शेवटच्या प्रवासासाठीही स्मशानभूमी नाही!; भंडार्ली-गोठेघर म्हाडा परिसरातील नागरिकांचा संताप दिवा येथे अंत्यसंस्काराची वेळ; मूलभूत नागरी सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

नवी मुंबई प्रतिनिधी

भंडार्ली-गोठेघर म्हाडा परिसरातील रहिवासी स्व. नीलम लिलाधर अदम यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांना दिवा येथील स्मशानभूमीत जावे लागल्याची घटना समोर आली आहे. परिसरात स्मशानभूमीची सुविधा नसल्यामुळे दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांना मोठी धावपळ, मानसिक त्रास आणि गैरसोयींचा सामना करावा लागला. या घटनेनंतर परिसरातील मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भंडार्ली-गोठेघर परिसरात हजारो कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, घरे उभारल्यानंतरही शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक आणि स्मशानभूमी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव कायम असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक पायाभूत सुविधा विकसित न झाल्याने नागरिकांना दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “घर देणे हा विकासाचा शेवट नसून सुरुवात आहे. त्या घराभोवती सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासन आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे.” आपल्या प्रिय व्यक्तीच्या अखेरच्या प्रवासासाठीही अनेक किलोमीटर दूर जावे लागणे ही अत्यंत वेदनादायी बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर नागरिकांनी शासन, म्हाडा आणि संबंधित प्रशासनाने भंडार्ली-गोठेघर म्हाडा परिसरात तातडीने सुसज्ज स्मशानभूमी उभारावी, तसेच शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक आणि इतर मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • भंडार्ली-गोठेघर म्हाडा परिसरात तातडीने सुसज्ज स्मशानभूमी उभारावी.
  • शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बाजारपेठ सुरू करावी.
  • सार्वजनिक वाहतुकीची सुविधा वाढवावी.
  • वाढत्या लोकसंख्येनुसार सर्व मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

दरम्यान, स्व. नीलम लिलाधर अदम यांना परिसरातील नागरिकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना व्यक्त करण्यात आली.

https://lokbhavanmarathinews.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!